Monday, February 1, 2016

ब्राझीलमधील लोकलढा, आजच्या जागतिक प्रश्नांचा चेहरा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' वर्ग आॅक्टोबर २०१५

गणेश बिराजदार, धरामित्र वर्धा

[सुचना : प्रस्तुत लेख हा विस्तृत शोधनिबंध नसून पावरपाॅंइट प्रेसेंटेशनच्या साह्याने केलेल्या मांडणीचा सारांशलेख आहे . येथे दिलेली माहिती आणि आकडेवारी प्रत्यक्ष वस्तुस्थितीपेक्षा वेगळी असू शकते, त्यामुळे आवश्यक तेव्हा ती इतर स्त्रोतांमधून पडताळून घ्यावी (जरी बहुतेक आकडेवारी ही विविध शोधनिबंधांमधून पडताळणी केलेली आहे, आणि संबंधीत शोधनिबंधांचा संदर्भ जोडलेला आहे). येथे संदर्भ जोडलेले शोधनिबंध इतकेच दर्शवितात की, संबंधीत मुद्यांवर अधिक माहितीसाठी वाचकाच्या माहितीस्तव ते जोडले आहेत, मात्र त्यांचा विस्तृत अभ्यास या लेखासाठी केला गेलेला नाही. लेखातील बहुतांशी माहिती ही पोर्तुगीज भाषिक ब्राझीलमधील घडामोडींसंदर्भात असल्यामुळे बरेच संदर्भलेख हे पोर्तुगीज भाषेत आहेत, मात्र पोर्तुगीज लेखांचे चांगले इंग्रजी भाषांतर गुगलच्या साहाय्याने होऊ शकते.]

चाैकट १

दिनांक २६ आॅक्टोबर ते १२ डिसेंबर या दरम्यान ग्वारारेमा, ब्राझील येथे, 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा सात आठवड्याचा वर्ग पार पडला. या वर्गाचा उद्देश, त्याची पार्श्वभूमी आणि त्यातून एक प्रशिक्षणार्थी म्हणून माझे झालेले शिक्षण याची मांडणी या लेखात केलेली आहे.


भूमीहीन कामगार (भू.का.) चळवळीची एेतिहासिक पार्श्वभूमी

चाैकट ३ आणि ४
प्रस्तुत प्रशिक्षण वर्ग ब्राझील मधील भू.का. संघटना, शेतकरी आणि इतर ग्रामीण व्यवसायिकांच्या हक्कासाठी लढणारे आंतरराष्ट्रीय संघटन 'ला व्हिया कॅंपेसिना' आणि 'बर्था फाऊंडेशन' यांच्या एकत्रित प्रयत्नातून आयोजित केला गेला होता. या अभ्यासक्रमाचा उद्देश समजून घेण्यासाठी या संघटनांची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. सुरूवातीला आपण ब्राझीलमधील भू.का. चळवळीची एेतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊ.
साधारण १६ व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगिजांनी ब्राझीलचे वसाहतीकरण केले. त्यानंतर सुमारे दोन शतके ब्राझीलची इतर देशांना ऊस पुरवणारी वसाहत अशी अोळख राहिली. या पिकांची शेती मुख्यतः प्रचंड मोठ्या आकाराच्या शेतांमधून आफ्रिका खंडातून आणलेल्या गुलामांच्या साहाय्याने होत होती (नास्तारी, १९८३). त्यामुळे ब्राझीलच्या समाज-राजकीय जीवनावर ही मोठी शेती सांभाळणाऱ्या, मुख्यतः युरोपातून आलेल्या जमीनदार वर्गाचे वर्चस्व होते.
मात्र १९ व्या शतकाच्या मध्यावधीस जगभरात गुलामगिरी निर्मुलनाची प्रक्रिया वेग घेत होती. .. १८५० साली कायद्याने गुलामांच्या व्यापारावर बंदी आणली गेली आणि इ.. १८८८ मध्ये देशांतर्गत गुलामगिरीवरही बंदीसाठी कायदा लागू करण्यात आला. या बदलत्या परिस्थितीत मोठ्या ब्राझीलीय जमीनदारांच्या एकाधिकारशाहीला धोका निर्माण होणार होता. कारण, या काळात ब्राझीलमध्ये जमीन पुनर्वाटणी आणि सुधारणेची मागणी जोर धरत होती. याचा अर्थ गुलामीतून नव्याने मुक्त झालेल्या लोकांना जमिनी द्याव्या लागण्याची शक्यता होती. मात्र अशा प्रकारच्या जमीन हस्तांतरणाची मागणी दुर्लक्षित करून इ. . १८५० साली ब्राझीलीय सरकारने जमीन मालमत्ता (Lei da terras) कायदा पारीत केला, ज्या कायद्याने प्रस्थापीत केले की जमीन मिळविण्यासाठी सरकार किंवा जुण्या जमीन मालकाकडून विकत घेणे हा एकमेव अधिकृत मार्ग असेल (पिंटो, २००४). त्यामुळे अर्थातच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पुनर्वसनाची शक्यताच दुर्मिळ झाली.

चाैकट ५
अशा प्रकारच्या अन्याय्य जमीन अधिकारांविरूद्ध पहिला लढा हा कॅथोलिक उतरंडीबाहेरील काही धार्मिक गुरूंच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या चळवळींनी दिला. उदाहरणार्थ एकोनिसाव्या शतकाच्या अखेरीस अंतोनिअो काॅन्सिलेरो नावाचे आध्यात्मिक गुरू आपल्या शिष्यांसह लहान-लहान कामे करत आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याची मागणी करत गावोगावी फिरले. त्यांनी आपण प्रेषित आहोत असा दावा केला आणि सुप्रसिद्ध पोर्तुगीज राजा 'सिबास्तीयन' चे राज्य पुन्हा येईल असे भाकित केले. बऱ्याच काळच्या भटकंतीनंतर त्यांनी १८९३ साली सुमारे ३०,००० शिष्यांसह कॅनुदोस नावाच्या मोठया शेतावर स्थायीक होण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्यांची प्रवचने आणि अधिक चांगल्या जगाच्या आश्वासनाने आकर्षित होऊन सुमारे ८००० लोक नव्याने समुहात सामील झाले. दरम्यानच्या काळात काही कारणांनी जुआझेहो शहरावर या समुहाचा हल्ला होईल या भितीने त्या शहराच्या महापाैराने विभागीय शासनाकडे मदत मागितली. त्यानंतर ही वसाहत आणि ब्राझीलीय सैन्य यांच्यात सुरू झालेल्या संघर्षात वेगवेगळ्या अंदाजानुसार सुमारे १५ ते ३० हजार जणांनी प्राण गमावले आणि त्यानंतर वसाहत मोडीत निघाली (साैजा, २०१३). अशाच प्रकारचे जमिनीवर हक्क सांगण्यासाठीचे लढे देशात वेगवेगळ्या भागात झाले, मात्र त्यातून सामान्यांसाठी कायमस्वरूपी उपाय निघू शकला नाही.

भू.का. चळवळीची स्थापणा आणि काम

चाैकट ६ आणि ७
विसाव्या शतकाच्या मध्यवधीत ब्राझीलमधील डाव्या चळवळीच्या नेत्यांमध्ये एकमत निर्माण झाले की जमीन अधिकारांच्या लोकशाहीकरणासाठी १८५० चा जमीन मालमत्ता कायदा पुरेसा नसून त्यासाठी नवे जमीन सुधारणा धोरण अत्यंत आवश्यक होते. याच काळात जमीन मालमत्ता पुनर्रचनेसाठी पुन्हा प्रयत्न झाला तो सामोपचार आणि कायद्याच्या मार्गाने जमीन सुधारणा करू पाहणाऱ्या शेतकरी चळवळींच्या माध्यमातून. मात्र १९६४ च्या लष्करी उठावानंतर आलेल्या लष्करशाही शासनाने ही चळवळ मोडीत काढली आणि नवीन जमीन सुधारणा धोरण आणले, ज्याचा मुख्य उद्देश हा मोठ्या आकाराच्या अाैद्योगिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि देशाचे सामरीक एकीकरण हा होता. त्यामुळे जमिनीवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी एक वेगळी वाट धरताना १९८०-८१ च्या दरम्यान सुमारे ६००० भूमीहीन कुटूंबानी हिअो ग्रांजे दो सुल या राज्यातील अनुत्पादक जमिनींवर एका वसाहतीची स्थापणा केली. ही जागा 'इन्क्रुझिलादा नातालिनो' म्हणून अोळखली जाते. आणि अशा प्रकारे जमीन अधिग्रहनाच्या एका नवीन प्रयोगाला ब्राझीलमध्ये सुरुवात झाली. याच भूमीहीन कामगारांच्या संमेलनात जानेवारी १९८४ मध्ये पराना या राज्यात भूमीहीन कामगार (भू.का.) चळवळीची स्थापना झाली. मुख्यत्वे अनुत्पादक अशा, बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या जमिनी शोधून त्यावर भूमीहीन कामगारांचे पुनर्वसन करण्याचे काम या संघटनेद्वारे केले जाते. यामध्ये सुरूवातील अशा जमिनींमध्ये तात्पुरत्या वसाहती (acampamento) वसविल्या जातात आणि नंतर कायदेशीर लढाई आणि अधिकृतीकरण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यास त्यांचे कायदेशीर कायमस्वरुपी वसाहतीं (assentamento) मध्ये रुपांतर होते.

चाैकट ८ ते १६
आज विविध संघटना आणि शासनाच्या मदतीने २०१० पर्यंत सुमारे १२ लाख ३८ हजार कुटूंबाचे कायमस्वरूपी वसाहतींमध्ये पूनर्वसन झाले आहे (मातेइ, २०१३). अशी वसाहत सुरू करताना पहिली दोन कामे सुरू केली जातात ती म्हणजे शाळा आणि शेती. पुढे जाऊन समाजाची या प्रयोगाला मान्यता मिळावी आणि हा एक जमीन सुधारणेचा शाश्वत आणि योग्य मार्ग म्हणून प्रस्थापीत व्हावा यासाठी १९९० च्या दशकापासून भू.का. चळवळीने शाश्वत शेती पद्धतींचा स्विकार आणि शेतीशी जोडलेल्या प्रक्रिया उद्योगाचा विकास या कामांवर भर दिला. त्यातून आज अनेक सहकारी संस्था आणि कृषीउत्पादन प्रक्रिया उद्योग उभे झाले आहेत. कोपावी या सहकारी संस्थेतील व्यवस्थापिका सांगतात, “आम्ही आमच्याकडे उत्पादित झालेले अन्न हा सामान्य लोकांशी संवाद साधन्याचे साधन समजतो. जेव्हा लोक बाजारात आमच्याकडे उत्पादीत झालेले दर्जेदार उत्पादन पाहतात तेव्हा आपोआप त्यांची संघटनेच्या कामाकडे पाहण्याची दृष्टी बदलते.” त्यामुळे आज हळूहळू भू.का. चळवळीची लोकप्रियता वाढत आहे, आणि त्यामुळे जमीन सुधारणा कार्यक्रमाच्या कामाला गती येत आहे. आणि ज्या पद्धतीने ही संघटना काम करते, त्यामुळे हा विश्वास वाटतो की, इथुनही पुढे बराच काळ ती ब्राझीलमधील समाज-राजकीय जीवन प्रभावीत करत राहील.

भू.का. चळवळ – तत्वज्ञान, संघटनात्मक संरचना आणि कार्यपद्धती

चाैकट १७
इतक्या मोठ्या प्रमाणावर सामान्य ब्राझिलीय माणसाचं आयुष्य प्रभावीत करणारी चळवळ चालते कशी आणि ती अजूनही बराच काळ टिकून राहू शकेल हा विश्वास कशामुळे वाटतो? या प्रश्नाचं उत्तर समजून घेणे म्हणजे भू.का. चळवळीचे संघटनात्मक तत्वज्ञान, संरचना आणि कार्यपद्धती समजून घेणे. भू.का. चळवळीच्या संघटनात्मक चळवळीचे मला समजलेले सार म्हणजे भू.का. चळवळीच्या महाजालीय संकेतस्थळावर 'शिक्षण' या विषयाबद्दल मांडलेली ही भूमिका, “शेतजमीन हे कामाची संधी, उत्पादन आणि सन्मानजनक जगण्याच्या शक्यतेचे प्रतिक असेल, तर शिक्षण हे ती लढाई चालू ठेवण्यासाठीचे मुलभूत साधन आहे.भू.का. चळवळीचे जे काही यश आहे, त्याच्या मुळाशी दोन गोष्टी आहेत असे मला वाटते, एक चळवळीची संघटनात्मक रचना आणि दोन शिक्षण. या मुद्यांची मांडणी कशी करावी, आधी कुठला मुद्दा घ्यावा, दोन मुद्दे कसे जोडावे याचा विचार करताना खरेतर माझा खूप गोंधळ झाला. नंतर मला जानवलं की, याचं कारण म्हणजे या चळवळीच्या संदर्भात मुळी हे दोन वेगवेगळे घटक नाहीतच. पुढील मांडणीतून तुम्हाला जानवेल की, या चळवळीची संघटनात्मक रचना हीच प्रामुख्याने भू.का. चळवळीचा भाग असलेल्या सामान्य शेतकरी आणि कार्यकर्त्यांची जीवनपद्धती आहे, आणि ही जीवनपद्धती हेच शिक्षणाचे साधन मानले गेलेले आहे.
ाैकट १ आणि १
तर आपण सुरुवात मुलभूत संघटनात्मक संरचनेपासून करू. त्यासाठी मला आमच्या स्वतःच्या वर्गाच्या अनुभवाचे उदाहरण द्यायला आवडेल. आम्ही सात आठवड्याच्या या वर्गात साधारण त्याच पद्धतीचे जीवन जगत होतो, जे भू.का. चळवळीच्या वसाहती, शिक्षणसंस्था किंवा इतर कुठल्याही समुदायात जगले जाते. सुरुवातीला या प्रशिक्षण वर्गात सहभागी असलेल्या साठ-पासष्ठ जणांचे दहा-दहाच्या सहा एकक गटांमध्ये विभाजन करण्यात ज्यांना केंद्रक गट (पोर्तुगीजमध्ये Nucleos de Base) म्हटले जाते. हे गट म्हणजे संरचनेतील एकक गट. या प्रत्येक गटातील दोन प्रतिनिधी (एक स्त्री आणि एक पुरूष) मिळून समन्वयक गट (Coordenação Político Pedagógica, CPP) तयार होतो. आणि हा गट व शाळेतील शिक्षण प्रतिनिधींचा मिळून प्रशिक्षण वर्ग समन्वय गट. प्रशिक्षण प्रक्रियेतील प्रत्येक कृती ही केंद्रक गटाभोवती केंद्रीत. प्रत्येक गटावर एकेका आठवड्यात होणाऱ्या वर्गांचे नियोजन करण्याची, अर्थात त्या आठवड्यात कोण वक्ते बोलणार आहेत, त्यांची अोळख, वर्गाच्या वेळांचे नियोजन, किंवा गरजेनुसार वेळापत्रकातील बदलांची जबाबदारी. याशिवाय वर्गात झालेल्या विषयांवर चर्चा करायची आणि काही मांडणी करायची, दर आठवड्याला एक बैठक घेवून त्या आठवड्यात झालेल्या गोष्टींचे मुल्यमापण आणि सुधारणेसाठी उपाययोजनांची चर्चा हे प्रत्येक गटासाठी अनिवार्य. यातून आलेल्या मुद्दे गटातील प्रतिनिधी समन्वयक गटापर्यंत पोहचवितात आणि त्यातून काही निर्णय घेतले जातात. अर्थात यामध्ये गटप्रतिनिधी हे नेते म्हणून नाहीतर केवळ गटाचे संदेशवाहक म्हणून भूमिका बजावतात. अशा प्रकारच्या रचनेमध्ये केंद्रक गटामुळे काय साध्य होऊ शकते? एक, दोन, तीन असे मुद्दे मांडण्याएेवजी त्याची प्रत्यक्ष अनुभवलेली उदाहरणे सांगितली तर अधिक सहजपणे ते दृष्टीगोचर होईल असे मला वाटते. कंटेस्टॅदो नावाच्या कायमस्वरुपी वसाहतीत भेटलेले एक शेतकरी म्हणाले, “आज आमच्या गटाला वाटतंय की, आमच्या शेतीच्या आत्ताच्या रचनेमध्ये काही बदल केले (उदा., जवळच्या शेतांमध्ये कुठली पिके घ्यावी, आणि दुरच्या शेतात कुठली; जनावरांचे गोठे कुठे असने अधिक सोईचे होईल इ.) तर आमच्या गटासाठी अधिक कार्यक्षम आणि फायद्याचे होऊ शकेल.” मला वाटतं की केवळ सततचा संवाद आणि त्यातून वाढणारी समज यातूनच अशा प्रकारचा विचार, आणि त्याहीपलिकडे समुहाच्या पातळीवर असा विचार विकसित होऊ शकतो. दुसरे उदाहरण कोपावी या सहकारी दुग्ध आणि इतर कृषीमाल प्रक्रिया उद्योगाच्या स्थापनेचे. ही सहकारी संस्था कुठल्यातरी वरीष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयाचा परिणाम म्हणून नाही, तर त्याच समुहातील सदस्यांना एका टप्प्यावर अशा प्रकारचा उद्योग आपण सुरू करू शकतो असे वाटले म्हणून झाली. त्याचबरोबर विविध ठिकाणी झालेल्या संवादांमधून जाणवले बहुतांश भू.का. वसाहतींचा भाग असलेल्या बहुतेक सदस्यांना देशातील समाज-राजकीय परिस्थितीची साधारण जानीव होती. त्यामुळे या प्रकारच्या संघटनात्मक रचनेची ताकद मला काय वाटते, तर त्यातुन समुहातील प्रत्येक सदस्यांमध्ये निर्णक्षमता आणि राजकीय जानीवेचा विकास होतो. आणि निरंतर शिक्षणाची प्रक्रिया निर्माण होते, त्यामुळे चळवळीमध्ये मरगळ किंवा साचलेपणाची शक्यता कमी होते.
चाैकट २० आणि २१
भू.का. चळवळीच्या संघटनात्मक संरचनेचे अजून एक विशेष म्हणजे त्यांनी उभारलेल्या शिक्षणसंस्थांमधील प्रवेशप्रक्रिया आणि अभ्यासक्रमांची रचना. या शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता यादी किंवा प्रवेश चाचणीचा मार्ग अवलंबला जात नाही, तर इच्छुक विद्यार्थी हा कुठल्यातरी चळवळ किंवा संघटनेचा कार्यकर्ता असला पाहिजे आणि त्याचे नाव त्या संघटनेद्वारे सुचविले गेले पाहिजे. याशिवाय अभ्यासक्रम काळात त्या विद्यार्थ्याने सामाजिक कामासाठी वेळ दिला पाहिजे. साधारण शिक्षणक्रम वेगवेगळ्या आवर्तणांमध्ये विभागलेला असतो, ज्यामध्ये काही काळ शिक्षणसंस्थेत काम करणे, आणि काही काळ त्याविषयी प्रत्यक्ष एखाद्या समुदायासोबत काम करणे अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना राहते. परिणामस्वरूप, लॅटीन अमेरिकन पर्यावरणीय शेती शाळेतील अभ्यासक्रम समन्वयक सांगतात, “मागच्या दहा वर्षात इथून शिक्षण झालेल्या १०२ विद्यार्थ्यांपैकी ९०% विद्यार्थी इतर शाळांमध्ये मार्गदर्शक, चळवळीच्या नेतृत्वात किंवा चळवळीतच तांत्रिक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत.”
सारांश, संघटनात्मक रचनेच्या दृष्टीने भू.का. चळवळ जगावेगळी आणि अभेद्य नक्कीच नाही. पण या संरचनेची खरी ताकत मला काय वाटते तर ज्या गोष्टी (उदाहरणार्थ, कायम नव्या नेतृत्वाची निर्मिती, समाज-राजकीय दृष्ट्या सजग समुहसदस्य, निरंतर शिक्षण इ.) एखादी चळवळ प्रभावी आणि शाश्वत होण्यासाठी आवश्यक असतात, त्या या संघटनेच्या विशिष्ट संरचनेतून स्वाभाविकपणे घडतात.


नवउदारमतवाद आणि 'ला व्हिया कॅंपेसिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चळवळींचा उदय


चाैकट २२
हे झाले भू. का. चळवळ आणि तिच्या पार्श्वभूमीविषयी. हा अभ्यासक्रम कशासाठी हे समजून घेण्यासाठी अजून एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे ज्या समाज-राजकीय पार्श्वभूमीवर जगातील वेगवेगळ्या लोकचळवळींना एकत्र येण्याची गरज वाटत आहे आणि 'ला व्हिया कॅंपेसिना' सारख्या आंतरराष्ट्रीय चळवळी उदयास येत आहेत.
विसाव्या शतकाच्या मध्यावधीस जगातील अनेक देश वसाहतवादी राज्यव्यवस्थेतून मुक्त झाले आणि नवी राष्ट्रराज्ये उदयास आली. या काळात आैद्योगिकीकरण हे विकासाचे मुख्य मानक असल्यामुळे नव्याने उदयाला आलेले बहुतेक देश आयात प्रतियोजन आैद्योगिकीकरणा (Import Substitution Industrialization) च्या प्रक्रियेत गुंतली होती. अर्थात त्यासाठी स्थानिक उद्योगांच्या विकासासाठी राष्ट्रीय उत्पादन वळवले गेले (मार्टीनेझ-टोरेस, एलाना आणि रोजेट, २०१०). म्हणजे काय तर उद्योगधंद्याना प्रोत्साहन मिळावे यासाठी अनेक सवलती द्यायच्या, कामगारांचे पगार मर्यादीत ठेवायचे. मग हे कामगार कसे जगणार तर त्यासाठी शेतीउत्पादनाच्या किमतींवर नियंत्रण ठेवायचे. लॅटीन अमेरिका, आफ्रिका, आशिया खंडातील बहुतेक देशांमध्ये अशाच पद्धतीचे धोरण राबविले गेले. परिणामतः शेतकरी वर्ग कायम गरिबीच्या स्थितीत, जेमतेम जगत राहिला.
पुढे ८० आणि ९० च्या दशकात आलेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने ही परिस्थिती अधिक वाईट केली. जागतिकीकरणाच्या पुरस्कर्त्यांच्या मते व्यापाराचे नियम हे तुलनात्मक लाभा (comparative advantage) च्या तत्वावर आधारलेले असावे (क्रेब्स, ., लेहमन, के. (एन.डी.). सोप्या भाषेत तुलनात्मक लाभ म्हणजे एखादी वस्तू आपल्या देशाच्या तुलनेत इतर कुठे अधिक स्वस्तात तयार होत/पिकत असेल तर ती देशात पिकवण्याएेवजी बाहेरून विकत घ्यावी आणि आपल्याकडे सहज तयार होणाऱ्या/पिकणाऱ्या वस्तू इतर देशांना विकाव्या. प्रथमदर्शनी खर्च वाचविण्याची उत्तम युक्ती, पण प्रत्यक्षात काय होते? तर अमेरिकेने गहू आणि मक्याचा मुख्य निर्यातदार म्हणून आपला जागतिक बाजारात प्रभाव रहावा यासाठी कृषी अनुदानांच्या मदतीने कृत्रीमपणे या पिकांच्या किमती उत्पादनखर्चापेक्षाही कमी केल्या (क्रेब्स, ., लेहमन, के. (एन.डी.). त्यामुळे समजा बाजारात गव्हाचा भाव २० रू. किलो असेल तर इतर देशातील शेतकऱ्यांना ३० रू प्रति किलोही उत्पादन खर्च आला तरी याच भावाने आपले पिक बाजारात विकावे लागते. उत्तर अमेरिकन मुक्त व्यापार करारात (NAFTA) सामील होताना मेक्सिकोने आपल्या स्थानिक मका उत्पादकांचे संरक्षण करण्याचा हक्क सोडला. काही अर्थतज्ञांच्या मते यामुळे हा करार लागू झाल्यापासून १० वर्षाच्या काळात कमीतकमी ७ लाख ते जास्तीत जास्त एक कोटी मेक्सिकन शेतकरी विस्थापित होतील (क्रेब्स, ., लेहमन, के. (एन.डी.). त्यामुळे आतापर्यंत जो शेतकरी जेमतेम जगत होता, तो जागतिकीकरण प्रक्रियेच्या सुरूवातीनंतर मागच्या दोन-तीन दशकात एकतर आत्महत्त्या करत आहे किंवा शेती करणे सोडत आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या सीमाविहीन बाजारयंत्रनेमुळे या शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढू पाहणाऱ्या संघटनांसमोरील आव्हानाचे रूपसुद्धा पुर्णतः बदलले. अशा पद्धतीने की उदाहरणार्थ, ७० च्या दशकात धान्याला योग्य भाव मिळावा म्हणून अमेरिकेतील शेतकरी संघटनांनी या बाजारपेठेवर नियंत्रण असलेल्या कारगील कंपनीला टाळून स्वतःहून धान्य जागतिक बाजारात विकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारगीलने सुमारे २ कोटी ७० लाख किलो गहू अर्जेंटिनाहून आयात करून कृत्रीमपणे गव्हाचे भाव पाडून या शेतकरी संघटनांना हतबल केले (क्रेब्स, ., लेहमन, के. (एन.डी.). अशा पद्धतीने एकीकडे केवळ देशांतर्गत पातळीवर याविरुद्ध संघर्ष उभारणे अशक्य झाले आहे. दुसरीकडे, आपण मुळात ही बाजारव्यवस्था नाकारून समांतर देवाणघेवाण व्यवस्था उभारू असा विचार करू तर या अन्नधान्य उत्पादनाचा मुख्य ग्राहक, बहुसंख्य सामान्य मजूर, शेतमजूर, आणि शहरी कामगार वर्ग स्वतः या नववसाहतवादी अर्थव्यवस्थेचा बळी आहे. त्यामुळे जेमतेम मोबदल्यात काम करणाऱ्या या वर्गाकडून शेतकरी वर्गाची स्थिती समजून घेण्याची आणि समजली तरी त्यासाठी न्याय्य मुल्य देवू शकण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही.
त्यामुळे जगभरातील अनेक संघटनांना जानवत आहे, की आता हा संघर्ष स्थानिक किंवा देशाच्या पातळीवर लढने शक्य नसून जगभरातील संघटनांना काही पातळीवर एकत्र एेवून काम करण्याची गरज आहे. याच जानीवेतून १९९२ साली निकारागुआ येथे एकत्र आलेल्या वेगवेगळ्या शेतकरी आणि इतर ग्रामीण संघटनांच्या संमेलनात ला व्हिया सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनाची कल्पना पुढे आली. त्यानंतर १९९३ साली बेल्जियममध्ये झालेल्या बैठकीत अधिकृतपणे ला व्हिया ची स्थापणा झाली (मार्टीनेझ-टोरेस, एलाना आणि रोजेट, २०१०).


'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण वर्ग' - लोकलढ्याच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा एक भाग


चाैकट २३
या प्रक्रियेतूनच एकत्र आलेल्या ला व्हिया आणि ब्राझीलमधील भू.का. संघटनेने अशा प्रकारचे जागतिक संघटन अधिक सुदृढ व्हावे या उद्देशाने भू.का. संघटनेची शिक्षणसंस्था असलेल्या फ्लोरेस्टीन फर्नांडीस राष्ट्रीय विद्यालयात, 'राजकीय संघटकांसाठी राजकीय प्रशिक्षण' हा वर्ग मार्च २०१५ पासून सुरूवात केला. साधारणतः ६-७ आठवड्याच्या या प्रशिक्षण वर्गासाठी जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकचळवळीत गुंतलेल्या संघटनांना या प्रशिक्षण वर्गासाठी प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली जाते. या ७ आठवड्यादरम्यान मुख्यतः विविध चळवळींचा इतिहास, आजचे प्रश्न, आजचे समाज-राजकीय वास्तव, वर्गसंघर्ष, समाज-आर्थिक नातेसंबंध आणि वर्गसंघर्षाचे मार्क्सवादी विश्लेषण अशा विषयावर व्याख्याने, चर्चा आणि अभ्यास होतो. याशिवाय वेगवेगळ्या देशातून आलेले प्रतिनिधी त्यांचा देश आणि स्थानिक परिस्थिती आणि त्या-त्या संघटनांच्या कामाबद्दल मांडणी करतात. आॅक्टोबर ते ड़िसेंबर २०१५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या वर्गामध्ये २१ देशातून सुमारे ४० संघटनांच्या ६०-६५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला.


अन्न सार्वभाैमत्वाचा लढा आणि लोकचळवळ उभारण्यासमोरील महत्वाचे आव्हान


चाैकट २४
पण या कामासाठी लोकचळवळींसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जनसामान्यांची एकंदर परिस्थिती आणि प्रश्नाबद्दलची समज. उदाहरणार्थ, बहुतेक शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, याची जानीव आहे, पण यामागे किती प्रचंड मोठी पिळवणूक आहे आणि ती कोणाकडून आणि कशी चालते याबद्दल स्पष्ट कल्पना बहुतेकांना नाही. हेच तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या कामगार वर्गालाही लागू होते. त्यामुळे एकंदर श्रीमंती आणि त्यामागची ही शोषक यंत्रना यातील नेमका दुवा माहीत नसल्यामुळे याच वर्गांची अजूनही मोठे कारखाने, मोठी धरणे हीच देशाच्या विकासाचे प्रतिक असल्याची समजूत आहे, आणि याला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते त्यामुळे प्रगतीचे विरोधक वाटतात. त्यामुळे चळवळीला पुरेसा जनाधार मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत जनसामान्यांना आजच्या समाज-राजकीय प्रश्नांचे हे मूळ समजणार नाही आणि लोकचळवळींची प्रगतीचे विरोधक ही कल्पना पुसली जाणार नाही, तोपर्यंत या लढ्याची सुरूवातही होणे शक्य नाही. त्यामुळे आज लोकचळवळींसाठी सर्वात प्राथमिक काम कुठले तर ते म्हणजे हे व्यापक लोकशिक्षणाचे काम कसे साधायचे हेच असेल असे मला वाटते.


संदर्भ :
क्रेब्स, ., लेहमन, के. (एन.डी.). कंट्रोल आॅफ वर्ल्डस् फुड सप्लाय. रिट्राइव्हड फेब्रुवारी ०१, २०१६, फ्राॅम http://www.converge.org.nz/pirm/ctrlfood.htm
नास्तारी, पी. एम. (१९८३). द रोल आॅफ शुगरकेन इन ब्राझीलस् हिस्टोरी अॅंड इकाॅनाॅमी.
पिंटो, सी.आय. (२००४). आ ली दा तेहास जे १८५०. क्लेपसिद्रा : रिव्हिस्ता जे हिस्तोरिया, (२०), .
मातेइ एल. (२०१३). आ रिफाॅर्मा अॅग्रारिया ब्राजीलिएरा : इव्हाॅलिसांअो दो नुमेरो जे फॅमिलियास असेंतादास नो पेरिएदू पोस-हिदेमोक्रेतीझासांअो दो पाइस. इस्तुदूस सोसिएदाजे ए अॅग्रिकुल्तुरा, .
मार्टीनेझ-टोरेस, मारिया एलाना आणि रोजेट, पीटर एम. (२०१०) 'ला व्हिया कॅंपेसिना : द बर्थ अॅंड, इव्हाॅल्युशन आॅफ अ ट्रान्सनॅशनल सोशियल मुव्हमेंट, जर्नल आॅफ पीजंट स्टडीज, ३७:, १४९-१७५
साैजा, .जी.अो.डी. (२०१३), गेहा जे कॅनुदूस.


Krebs, A., & Lehman, K. (n.d.). Control of the World's Food Supply. Retrieved February 01, 2016, from http://www.converge.org.nz/pirm/ctrlfood.htm
Martínez-Torres, María Elena and Rosset, Peter M.(2010) 'La Vía Campesina: the birth and evolution of
a transnational social movement', Journal of Peasant Studies, 37: 1, 149 — 175
Mattei, L. (2013). A reforma agrária brasileira: evolução do número de famílias assentadas no período pós-redemocratização do país. Estudos Sociedade e Agricultura2.
Nastari, P. M. (1983). The role of sugar cane in Brazil's history and economy.
Pinto, C. I. (2004). A Lei de Terras de 1850. Klepsidra: Revista virtual de historia, (20), 4.
Souza, A. G. O. D. (2013). Guerra de Canudos.

No comments:

Post a Comment